मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महिला, तरुण आणि शेतकऱ्यांवर अधिक फोकस करण्यात आल्याचा दावा निर्मला सीतारामण यांनी केला असला तरी केंद्राच्या या अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. देशाला कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली आहे. केंद्रसरकारने चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले तब्बल 48 हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. या केंद्रीय जीएसटीच्या बदल्यात महाराष्ट्राला अवघे साडेपाच हजार कोटी रुपये परत मिळाले. निधीवाटपातल्या या अन्यायाचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातही स्पष्टपणे दिसत असून अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केली आहे.