Sanjay Raut : राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत? म्हणाले, ‘तो करंटेपणा आमच्याकडून होणार नाही’

Sanjay Raut : राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत? म्हणाले, ‘तो करंटेपणा आमच्याकडून होणार नाही’

Harshada Shinkar | Updated on: Apr 19, 2025 | 3:36 PM

'महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी केली आहे. राज ठाकरे हे भाजप आणि एसंशिसोबत दिसत आहेत. आमच्यासाठी ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही. ते राज ठाकरे यांचा वापर करून मराठी माणसाला पडद्याआडून त्रास द्यायचं काम करत आहे. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते मराठी माणसावर उपकार होतील'

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर भाष्य केले. ‘ही मुंबई आणि मराठी माणूस त्याचा व्यवसाय आणि व्यवहारावर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. आम्ही वाट पाहू’, असं म्हणत संजय राऊत म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, राज ठाकरे यांच्याकडून चांगली भूमिका आली असेल तर ती नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापना केली. त्यांच्यसाोबतचा प्रवास आम्ही विसरू शकणार नाही. सर्व ठाकरे आणि आम्ही एक आहोत. मतभेद हे महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात घेतल्यामुळे झाले. बाळासाहेबांच्या शत्रूंना घरात घेतलं. हा आमच्यासाठी दुखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला आहे. व्यक्तीगत आम्ही एकमेकांच्या जवळ असल्याचे संजय राऊत म्हणाले. तर राज ठाकरे माझे मित्र आहेत. उद्धव ठाकरेंचे ते भाऊ आहेत. ते तुम्ही नाकारणार आहात का? असा प्रतिसवालच राऊतांनी माध्यम प्रतिनिधींना केला.

Published on: Apr 19, 2025 3:36 PM
Follow Us