Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार फुटून स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार फुटून स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
राऊत यांनी खासदारांच्या संभाव्य फुटीच्या बातम्या फेटाळून लावत, “शिवसेनेचे सर्व 9 खासदार एकत्र असून पक्षाशी निष्ठावान आहेत,” असे स्पष्ट केले. तसेच पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत काही खासदार नाराज असल्याच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले की, “अशी तक्रार कोणत्याही खासदाराने केलेली नाही. शरद पवार यांच्यानंतर लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना सर्वाधिक वेळ देणारे नेते म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. मातोश्रीचे दरवाजे नेहमीच सर्वांसाठी खुले असतात.”
दरम्यान, ठाकरे गटातील एका खासदाराने दिल्लीत शिंदे गटातील केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. “एखादा खासदार किंवा लोकप्रतिनिधी आपल्या कामानिमित्त कोणत्याही मंत्र्याला भेटू शकतो. त्यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.
तसेच केंद्रीय यंत्रणांच्या वापराबाबतही राऊत यांनी टीका करत, “ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवला जात आहे,” असा आरोप केला.
दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.