पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार होतं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली आहे. पंतप्रधान मोदी यांचा ताफ्या ज्या मार्गावरुन जाणार होतो. त्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पंतप्रधान मोदी सुमारे 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून होते. त्यानंतर मोदी यांनी आपला पंजाब दौरा रद्द केल्याचं सांगण्यात आलं.
पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘आज फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांना परतावं लागलं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो, असं चन्नी यांनी म्हटलंय. तसंच सुरक्षेत काही चूक नव्हती. आम्ही खराब हवामानामुळे मोदींचा दौरा रद्द करण्याची विनंती पीएमओला केली होती. पण त्यांनी मार्ग बदलला. आम्हाला कळवलंही नाही’, असं चन्नी म्हणत आहेत.