रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची

रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची

| Updated on: Jul 18, 2026 | 3:37 PM

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत चोरी झाल्याच्या कथित प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, आज नागपुरात 'रामरक्षा आंदोलन' आयोजित करण्यात आले आहे. मात्र, आंदोलनापूर्वीच या कार्यक्रमाच्या बॅनरवरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नागपुरात आयोजित केलेल्या रामरक्षा आंदोलनासाठी शहरातील विविध भागांत बॅनर लावण्यात आले होते. मात्र, हे बॅनर नागपूर महानगरपालिकेकडून हटवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. यामुळे पालिका कर्मचारी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत चोरी झाल्याच्या कथित प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, आज नागपुरात ‘रामरक्षा आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. मात्र, आंदोलनापूर्वीच या कार्यक्रमाच्या बॅनरवरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नागपुरात आयोजित केलेल्या रामरक्षा आंदोलनासाठी शहरातील विविध भागांत बॅनर लावण्यात आले होते. मात्र, हे बॅनर नागपूर महानगरपालिकेकडून हटवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. यामुळे पालिका कर्मचारी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या आंदोलनासाठी शिवसेना ठाकरे गटाने विविध हिंदुत्ववादी संघटनांनाही निमंत्रित केले असून, कार्यक्रमाची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. या आंदोलनासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले असून, त्यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तसेच साध्या वेशातील पोलीसही परिसरात तैनात करण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळासह आजूबाजूच्या इमारतींवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान, कार्यक्रमाबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, राजधानीनंतर उपराजधानी नागपुरात रामरक्षा पठण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसून धार्मिक स्वरूपाचा उपक्रम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आले असून, उपस्थित राहायचे की नाही हा त्यांचा निर्णय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या सर्व घडामोडींमुळे नागपुरातील रामरक्षा आंदोलन आणि बॅनर हटवण्याच्या वादाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Jul 18, 2026 3:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us