Vantara : मोठी बातमी, ‘वनतारा’कडून कोल्हापूरकरांची माफी अन् मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ‘महादेवी’ भविष्यात कुठं?
'वनताराचा सहभाग न्यायालयाने दिलेल्या बंधनकारक निर्देशांनुसार काटेकोर काम करण्यापुरता मर्यादित आहे. स्वतंत्रपणे चालवलेले पुनर्वसन केंद्र म्हणून त्यात वनताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे, तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरविणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे अशी होती.'
वनतारा प्रशासनाने समस्त कोल्हापूरकरांची माफी मागितल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरकर आणि जैन धर्मीयांना दुखावण्याचा आमचा कोणता हेतू नव्हता. महादेवी हत्तीणीला कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थलांतरित केलं असं वनताराकडून स्पष्ट करण्यात आलंय इतकंच नाहीतर कोर्टाने आदेश दिल्यास आणि कोल्हापूरच्या नांदणी मठाने समंती दिल्यास महादेवीसाठी नांदणी परिसरातच पुनर्वसन केंद्र सुरू करू, अशी माहिती वनताराने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत दिली आहे. ‘नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचे आत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे याची पूर्ण जाणीव वनतारास आहे. गेल्या अनेक दशकांपासून, ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे. माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो.’, असं वनतारानं म्हटलंय. तर वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचे स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही. धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू आमचा नव्हता, असेही वनतारानं म्हटलंय.
