राऊतांसाठी ‘शब्दकोश’ नव्हे, ‘अश्वकोश’ची गरज, नवनाथ बन यांची सडकून टीका
Navnath Ban vs Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर टीका केली होती. याला आता भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने शानदार विजय मिळवला आहे. आता भाजप बंगालमध्ये सरकार स्थापन करणार आहे. या विजयानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला समाधान मिळाले असेल असं विधान केले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली होती. याला आता भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी म्हटले की, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी सत्य बोलायला लावू नका. ज्याने कलकत्त्यामध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला होता, त्यांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल तर मिळू द्या. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विषयी त्यांनी बोललेलं बरं. कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये युनियन जॅक फडकवून ब्रिटिशांचा विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने युनियन जॅकला सल्यूट मारणारा सांगणारे श्यामाप्रसाद मुखर्जी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीचे व्याख्या बदलली, त्या पद्धतीने मोदी सुद्धा ट्रम्पला सॅल्युट मारत आहेत.
राऊतांच्या भाषेसाठी अश्वकोश तयार करावा लागेल – बन
भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर जोरदार टीका करत, ‘मराठीमध्ये शब्दकोश असतो, पण राऊतांच्या भाषेसाठी अश्वकोश तयार करावा लागेल, असा टोला लगावला. राऊत ज्या पातळीची भाषा वापरतात, त्यासाठी पारंपरिक शब्दकोश किंवा विश्वकोश अपुरे पडतील, असे सांगत बन यांनी व्यंगात्मक शैलीत म्हटले की, हा अश्वकोश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करावा, जेणेकरून त्यांच्या पक्षाची अधोगती का झाली हे महाराष्ट्राला समजेल.
हा तर दुटप्पीपणा…
नवनाथ बन यांनी राऊतांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, ‘काँग्रेस किंवा विरोधक जिंकले की लोकशाहीचा विजय म्हणायचा आणि भाजप जिंकली की लोकशाही धोक्यात आली असे म्हणायचं, हा दुटप्पीपणा आहे.’ त्यांनी स्पष्ट केले की, जनतेचा कौल मान्य करण्याची तयारी विरोधकांकडे नाही आणि म्हणूनच पराभवानंतर अशा प्रतिक्रिया दिल्या जातात.
जनतेने ममता सरकारच्या कारभाराचा हिशोब केला
पश्चिम बंगालमधील निकालावर बोलताना बन म्हणाले की, निवडणूक आयोग नव्हे, तर जनतेने ममता सरकारच्या 15 वर्षांच्या कारभाराचा हिशोब केला. त्यांनी हिंसाचार, अत्याचार आणि गुंडगिरीचा उल्लेख करत, जनतेनेच या पापांचा अंत केला असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातही जनतेने महायुतीला पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला नकार दिला, असे त्यांनी नमूद केले.
