‘डोक्याचा ताप’… टक्कल व्हायरसमुळे लग्नच जुळेना, मुलींचा लग्नाला चक्क नकार; गावकरी हवालदिल
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरांच्या पथकांनीही या आजाराचे निदान करू शकलेले नाही. केसगळतीमुळे सामाजिक बहिष्कार आणि लग्नांवरही परिणाम झाला आहे.

बुलढाण्यातील शेगावमधील काही गावांमध्ये केसगळतीचं प्रमाण वाढलं आहे. या गावांमधील लोक अचानक टकले व्हायला लागले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नवीनच संकट उभे राहिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीवरून डॉक्टरांचं पथक आलं तरी हा प्रकार कशाने होतोय हे त्यांनाही अजून कळलेलं नाही. त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. या प्रकारातून दिलासा मिळेल की नाही याची भीती त्यांना वाटू लागली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही केस गळतीचे प्रमाण वाढलं आहे. हे सुरू असतानाच आता या गावकऱ्यांसमोर आणखी एक नवं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे या गावातील तरुणांना कुणीही मुली द्यायला तयार नाहीत. त्यांचं लग्नच जुळत नसल्याने गावकरी चांगलेच वैतागले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात आलेल्या केस गळतीच्या आजाराने अनेकांना हैरान केल आहे. ज्या गावात केस गळतीच्या आजाराची रुग्ण सापडले त्या बोंडगावात कुणी लग्नासाठी मुलगीही द्यायला तयार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. टक्कल व्हायरसच्या भीतीने या गावात सोयरीक जुळत नाहीये. ऐन लग्नसराईच्या मौसमात लग्नाला आलेल्या मुलांना कोणी मुली देत नाहीयेत तर मुलींना देखील लग्नासाठी मागणी येत नाहीयेत, त्यामुळे पालकांना मोठी चिंता सतावू लागली आहे. आपल्याबलाही टक्कल व्हायरसची लागण होईल या भीतीने पालक मुलांना मुली देत नाहीये. तर बोंडगावातील मुलगी सून म्हणून आणली तर आपल्या घरात आणि गावात टक्कल व्हायरस पसरेल या भीतीने इतर गावातील लोक बोंडगावातील मुलींना मागणी घालत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कटिंग, दूध, भाजीपालाही मिळेना
इतकेच नाही तर टक्कल व्हायरस असलेल्यांना किराणा दुकानातून किराणा मिळत नाही. त्यांच्या समोर उभं राहयला कोणी तयार नाही. त्यांचा संसर्ग आपल्याला होण्याची भीती किराणा दुकानदारांना भेडसावत आहे. हीच भीती दूधवाल्याला भेडसावत असल्याने तो टक्कल असलेल्यांना दूध देत नाहीये. भाजीवाला भाजी देत नाही. सलूनमध्ये या लोकांची कटिंगही केली जात नाही. एवढेच नव्हे तर या लोकांना शेतात काम करण्यासाठी मजूरही मिळत नाहीये. त्यामुळे या गावातील लोक अधिकच त्रस्त झाले आहेत.
चक्कीवर दळणही मिळत नाही
आम्ही पाणी भरायला गेलो तर पाणी भरू देत नाही. भाजीपाला मिळत नाही. चक्कीवर दळण दळून मिळत नाही. बाहेर जाण्याचं आमचं बंद आहे. सोयरीक बंद आहे. सलूनवाले दाढीही करत नाही. वस्त्रा दुसऱ्याला वापरला तर आमचं दुकान बंद होईल. तुम्ही रिकव्हर झाल्यावर या, असं एका ग्रामस्थाने सांगितलं.
गावात पाहुणेच येत नाही
आमच्या गावात कोणी पाहुणेच येत नाही. त्यामुळे सोयरीक होत नाही. आम्ही 15 दिवसानंतर येऊ असं पाहुणे म्हणतात. मुलं असो की मुली असो दोघांना मागणी घातली जात नाही. गेल्या महिनाभरात आमच्या गावात कुणाचंही लग्न झालेलं नाही, असं एका तरुणाने सांगितलं. टक्कल पडल्याने आम्हाला काम मिळत नाहीये. त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ आलीय आहे, असं एका व्यक्तीने सांगितलं.
रुग्णांची संख्या वाढलीय
केस गळतीच्या आजाराचे निदान करण्यात अद्याप आरोग्य यंत्रणेला यश आलेले नाही. त्यामुळे टक्कल व्हायरसचा शोध लवकरात लवकर घेऊन गावकऱ्यांना या संकटातून मुक्त करावं, अशी मागणी गावकरी करू लागले आहेत. दरम्यान शेगांव तालुक्यातील केस गळतीच्या रुग्णाची संख्या आता 197 वर पोहचली आहे. मात्र अद्याप 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही ग्रामस्थांची केस गळती कशामुळे होतेय, याचा शोध लागलेला नाहीये.
आरोग्य पथक ठाण मांडून
केस गळती कशामुळे होतेय हे शोधण्यासाठी स्थानिक आरोग्य विभाग, आयुष मंत्रालयाची टीम, आयसीएमआरचे पथक आतोनात प्रयत्न करत आहे. तालुक्यातील गावात हे आयुष मंत्रालय पथक आणि आयसीएमआरचे पथक ठाण मांडून आहे. दोन्ही पथकाकडून विविध प्रकारचे नमुने गोळा करण्याचे काम चालू आहे. या नमुन्यांच्या अहवाल आल्यावरच या केस गळतीचे निदान होणार आहे. मात्र तोपर्यंत केस गळतीचे रुग्ण वाढतानाच दिसत आहेत.