Sanjay Raut : ‘मी जन्मापासून शिवसेनेत’ संजय राऊतांचा टोला नेमका कुणाला? प्रियंका चतुर्वेदींच्या नाराजीवर मोठा खुलासा
Sanjay Raut Big Statement: काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना खासदारांची बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेची जागा हातची गेल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यावर संजय राऊतांनी आज मतं मांडलं.

Sanjay Raut Big Statement: काल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याची चर्चा असताना ही बैठक महत्त्वाची ठरली. राज्यसभेची हक्काची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याविषयावर आज खासदार संजय राऊत यांनी मत मांडले. कालच्या बैठकीचे पडसाद भविष्यात उमटतील का, असा सवाल उपस्थित होत असताना राऊतांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे.
प्रियंका चतुर्वेदी नाराजीवर काय वक्तव्य?
काल झालेल्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेची जागा शरद पवार यांना दिल्यावरून संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी संजय राऊत यांच्यावर नाराजी या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. तर त्यांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणाची माध्यमात जोरदार चर्चा असताना, त्यावर आज सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मत व्यक्त केलं.
विचार करून काम करायला लागलो नसतो तर पक्ष वाढला नसता. मोठा झाला नसता. पण अशा प्रकाराचं काही घडलं नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. मी इतकेच म्हणाले की या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून मी या पक्षामध्ये आहे, असे राऊत म्हणाले. त्यांनी एका वाक्यात याप्रकरणावर पडदा टाकला आहे.
तपासावर संशय व्यक्त करणे योग्य नाही
तर अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री आणि पोलीस यांना आता शांतपणे काम करू द्यावं असे वक्तव्य त्यांनी अशोक खरात प्रकरणात केले. रोज या विषयावर चर्चा करून राज्यातील आणि देशातील इतर महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करू नये असे राऊत म्हणाले. तपास सुरू आहे. तपास सुरू असताना त्याच्यावर संशय व्यक्त करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. तर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अजितदादा पवार राष्ट्रवादी ताब्यात घेण्यासाठी निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार केल्याप्रकरणी राऊतांनी प्रतिक्रिया देणे टाळले. त्यांनी याप्रकरणी शिवसेना म्हणून आम्ही कशाला प्रतिक्रिया द्यायची असे उत्तर दिले.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती युद्धाविषयी सर्वपक्षीय बैठक बोलावल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना जर त्या बैठकीला पंतप्रधान उपस्थित नसतील, तर त्या बैठकीला काही अर्थ नाही असा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान येणार नव्हते, तर आम्ही त्या बैठकीला जाण्याचं टाळायला पाहिजे होतं, असे राऊत म्हणाले.
