Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, अखेर तटकरेंची कबुली; दादानंतर विलिनीकरण का नाही? थेट सांगितलं
Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याची स्पष्ट कबुली माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलिनीकरणाबाबत प्रचंड चर्चा झाल्या. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याची स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे. ‘दादां’च्या निधनानंतर परिस्थिती कशी बदलली आणि विलिनीकरण का होऊ शकले नाही, यावरही त्यांनी थेट भाष्य केले आहे.
नेते म्हणून दादाच करत होते चर्चा
माध्यामांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनिकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. ही बाब मीही सांगितली. कोणत्याही बैठकीला मी उपस्थित नव्हतो. पण बैठकीचा तपशील दादांकडून मला सांगितला जात होता. निर्णयाच्या प्रक्रियेत आम्ही होतो. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी फार मोठा गौप्यस्फोट केलाय असा भाग नाही. दादा एकटेच याची चर्चा करत होते. ते नेते होते. ते पवारांसोबतच्या आमदारांना काय वाटत होते. ते चर्चेला उपस्थित असतील तर त्यात गैर काय? त्यामुळे तनपुरेंचा गौप्यस्फोट म्हणता येत नाही.”
दादानंतर विलिनीकरण का टळले?
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा मांडताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, दादांच्या निधनानंतर राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली. “दादा गेल्यावर परिस्थिती बदलली. दादा असताना होणारे विलिनीकरण आणि दादा गेल्यावर होणारे विलिनीकरण यात खूप मोठा फरक आहे,” असे सूचक विधान तटकरे यांनी केले. परिस्थितीतील याच बदलामुळे विलिनीकरणाचा निर्णय पुढे जाऊ शकला नाही आणि पुढच्या काळात वेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या, असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिले आहे. सुनील तटकरे यांच्या या स्पष्टीकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरच्या पडद्यामागच्या घडामोडींवर आणि विलिनीकरणाच्या अपूर्ण राहिलेल्या प्रयत्नांवर मोठा प्रकाश पडला आहे.
पुढे सुनील तटकरे पार्थ पवारांविषयी बोलताना म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार सक्रिय होणं हे महत्त्ववाचं होतं. ते सक्रिय झाले. संघटनेत काम करताना काही बाबत वेगवेगळी मते असू शकतात. ९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. पवारांसारखं प्रभावी नेतृत्व मिळालं. पक्षात सर्वानुमते निर्णय घेतले जायचे. विधान परिषदेचे उमेदवार निवडायचे असतील, राज्यसभेचे असतील किंवा संघटनात्मक बाबतीत पदाधिकारी निवड असेल तिच पद्धत दादांनी अवलंबली. २०२३ नंतर आम्ही एनडीएत सहभागी झाल्यावर तिच पद्धती आम्ही सुरू ठेवली.”
