PoK साठी मोदींना 400 पार आवश्यक, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
देशात लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आता पीओकेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. अब की बार ४०० पारचा नारा भाजपने दिला आहे. त्यामुळे जर भाजपला ४०० हून अधिक जागा मिळाल्या तर भारत पीओके पुन्हा भारतात घेईल असे वक्तव्य केले जात आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नेते वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत आपल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत आहे. या दरम्यान पीओकेमध्ये होणारी निदर्शने हा देखील भारतात आता निवडणुकीचा मुद्दा बनत चालला आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पीओके हे आमचे आहे आणि आम्ही ते घेऊ. पीओकेवर भारताचा हक्क आहे. पीओकेवर भारताचेच अधिकार असेल हे कोणीही अमान्य करु शकत नाही. त्यामुळे आता पीओकेचा मुद्दा देखील लोकसभा निवडणुकीत चर्चेत येत आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
दुसरीकडे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देखील पीओकेवरुन मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ‘आम्हाला पीओके ताब्यात घेण्यासाठी ४०० जागांची गरज आहे. दिल्लीत प्रचार करताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेस विचारते 400 जागांची गरज का? काँग्रेस सत्तेत असताना आम्हाला सांगण्यात आले होते की काश्मीर जसे भारतात आहे तसेच ते पाकिस्तानात देखील आहे. पण ते जे काश्मीर पाकिस्तानकडे आहे ते पाकव्याप्त काश्मीर आहे. यावर आपल्या संसदेत कधीही चर्चा झाली नाही. आता तिथे लोक भारतीय तिरंगा हातात घेऊन पाकिस्तानचा निषेध करत आहेत. ही तर सुरुवात आहे. मोदीजींना 400 जागा मिळाल्या तर पाकव्याप्त काश्मीरही भारताचे होईल’.
अमित शाह काय म्हणाले?
पश्चिम बंगालमध्ये एका सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, इंडिया आघाडीची सत्ता असताना काश्मीरमध्ये संप व्हायचे. तिथे स्वातंत्र्याचे नारे लागायचे, आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचे नारे लावले जात आहेत. पूर्वी येथे दगडफेक व्हायची, आता तिथे दगडफेक होत आहे. 2 कोटी 11 लाख पर्यटकांनी काश्मीरमध्ये जाऊन नवा विक्रम रचला आहे आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पिठाच्या किमतीने विक्रम केला आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. हे मणिशंकर अय्यर, फारुख अब्दुल्ला देशाला घाबरवत आहेत की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचे आहे आणि आम्ही ते घेऊ.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही काश्मीरमध्ये ज्या प्रकारे शांतता प्रस्थापित झाली आहे आणि आर्थिक प्रगती होत आहे. तेव्हा पीओकेचे लोकं स्वतः भारतात विलीन होण्याची मागणी करतील, असे म्हटले होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, पीओके हा भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहील.