शेतातील काम उरकून घरी निघाले अन्… 15 जणांना घेऊन जाणारी बोट नदीच्या मध्यभागी उलटली, 3 जणांचा मृत्यू
बिहारमधील पाटणा जवळील उमानाथ घाटावर गंगा नदीत १५ ते १६ प्रवाशांनी भरलेली बोट उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी SDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

बिहारची राजधानी असलेल्या पाटणाजवळील गंगा नदीत गुरुवारी पहाटे बोट उलटल्याने भीषण अपघात घडला. ही बोट उमानाथ घाटाजवळ भाजीपाला घेऊन परतत होती, त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट नियंत्रणाबाहेर जाऊन नदीच्या मध्यभागी उलटली. या बोटीत सुमारे १५ ते १६ जण स्वार होते, ज्यामध्ये महिला आणि मुलींची संख्या अधिक होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. तर ७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप या बोटीतील ६ ते ७ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बरह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासूमगंज बिंद टोली येथील रहिवासी असलेले हे लोक नेहमीप्रमाणे गंगा नदी पलिकडे असलेल्या समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिउद्दीननगर येथील सुलतानपूर दियारा येथे गेले होते. तेथे शेतीची कामे उरकून या महिला सकाळी ५.४५ च्या दरम्यान भाजीपाल्याने भरलेल्या लहान होडीतून ते उमानाथ मंदिराच्या घाटाकडे परतत होते. हे लोक रोज सकाळी दियारा भागातून भाजी आणून उमानाथ मंदिर परिसरात विकायचे. मात्र गुरुवारी सकाळी नदीत अचानक वारा सुटला. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट एका बाजूला कलंडली आणि काही कळण्यापासूनच ती खोल पाण्यात शिरली. बोट उलटताच नदीत एकच आरडाओरडा आणि आक्रोश सुरू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. ज्यांना पोहता येत होते ते स्वतः पोहून बाहेर आले, तर काहींना स्थानिकांनी वाचवले. या अपघातात आतापर्यंत ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटली आहे. यात २ महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण मासूमगंज बिंद टोली येथील रहिवासी होते.
मृतांची नावे
- लीला देवी (वय ४० वर्षे)
- नीलम कुमारी (वय ३० वर्षे)
- काशी कुमार (वय १५ वर्षे)
बेपत्ता लोकांचा शोध सुरू; प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळताच बरह पोलीस ठाण्याचे अधिकारी ब्रजकिशोर सिंह, एसडीपीओ रामकृष्ण, एसडीएम (उपविभागीय अधिकारी) गरिमा लोहिया आणि सर्कल ऑफिसर डॉ. नरेंद्र कुमार सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यासाठी ‘एसडीआरएफ’ (SDRF) च्या पथकाला पाचारण केले आहे. प्रशासकीय नोंदीनुसार ५ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात असले, तरी पीडित कुटुंबीयांनी ७ जण बेपत्ता असल्याची यादी प्रशासनाला दिली आहे. यामध्ये श्रावण कुमार, राहुल कुमार, ममता देवी, कबुत्री कुमारी, दोन लहान मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी गंगा नदीत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे.
दोन जिल्ह्यांचे प्रशासन एकमेकांच्या समन्वयाने कार्यरत
हा अपघात पाटणा आणि समस्तीपूर जिल्ह्यांच्या सीमेजवळ घडल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचे प्रशासन एकमेकांशी समन्वय साधून बचावकार्य चालवत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता पाटणाचे जिल्हाधिकारीही लवकरच घटनास्थळी पोहोचतील, असे बोललं जात आहे. तसेच प्रशासनाने तातडीने मदत पुरवण्यासाठी उमानाथ घाट परिसरात एक तात्पुरते शिबिर उभारले असून, बचावकार्याला अधिक वेग देण्यात आला आहे.
