IND W vs PAK W: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही नो हँडशेक, हरमनप्रीत कौरने पाकिस्तानी कर्णधाराकडे केलं दुर्लक्ष
IND W vs PAK W, ICC Womens T20 World Cup: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही भारताकडून नो हँडशेक पॉलिसी कायम आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने हात मिळवला आहे. त्यामुळे भारताकडून नो हँडशेक पॉलिसी कायम आहे.

IND W vs PAK W, ICC Womens T20 World Cup: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे. हा सामना इंग्लंडच्या बर्मिंघम येथील ऐतिहासिक एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. या सामन्यात भारताकडून नो हँडशेक पॉलिसी कायम आहे. या सामन्यात काय होते? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पण भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेकीदरम्यान हात मिळवला नाही. गेल्या काही स्पर्धांपासून सुरू असलेली नो हँडशेक पॉलिसी या सामन्यातही दिसून आली. त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यात हा सामना रंगतदार होणार याचे संकेत नाणेफेकीपासूनच मिळाले आहेत. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. त्यानंतर पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाशी हस्तांदोलन न करता निघून गेली.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. मला वाटतं की फलंदाजीसाठी ही खूप चांगली खेळपट्टी आहे, त्यामुळे आम्ही विचार केला की चला फलंदाजी करून एक चांगली धावसंख्या उभारूया.’ विश्वचषक जिंकल्याने आत्मविश्वास मिळतो का? या प्रश्नावर हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘हो, मला वाटतं की आम्ही सर्वच खूप उत्साही आहोत. मागच्या विश्वचषकाने आम्हाला नक्कीच खूप आत्मविश्वास दिला आहे आणि आम्हाला तोच आत्मविश्वास या विश्वचषकात कायम ठेवायचा आहे.’
भारतीय संघाच्या तयारीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? या प्रश्नावर हरमनप्रीत कौरने सांगितलं की, ‘हो, नक्कीच. आम्ही बऱ्याच उणिवा दूर केल्या आहेत आणि आता फक्त चांगला क्रिकेट खेळायचा आहे आणि आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत. भारती आज खेळत आहे. आणि हो, यास्तिकाने खूप चांगली कामगिरी केली, पण आज आम्ही भारतीला खेळवण्याचा विचार केला. आम्ही तीन फिरकी गोलंदाज आणि दोन मध्यमगती गोलंदाजांसह खेळणार आहोत.’ दरम्यान, गेल्या वर्षी पुरुषांच्या आशिया कप स्पर्धेपासून नो हँडशेक पॉलिसी सुरू झाली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत ही पॉलिसी कायम आहे.
