IPL 2026: 5 कर्णधार आपल्याच टीमसाठी डोकेदुखी, हार्दिकचा कितवा नंबर?
IPL 2026 Captains : कर्णधार आपल्या टीमचा प्रमुख असतो. टीमच्या चांगल्या आणि वाईट कामगिरीसाठी कर्णधारच जबाबदार असतो. कर्णधाराकडून नेतृत्वासह वैयक्तिक कामगिरीही अपेक्षित असते. मात्र या 19 व्या मोसमात 5 कर्णधारांना काही विशेष करता आलेलं नाही. त्या 5 कर्णधारांबाबत जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अर्धा टप्पा जवळपास संपत आला आहे. या हंगामात आतापर्यंत एकूण 33 सामने खेळवण्यात आले आहेत. प्रत्येक संघाने किमान 6 तर कमाल 7 सामने खेळले आहेत. या पर्वात आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात 3 यशस्वी संघांनी निराशा केलीय. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तर इतर संघांनी जबरदस्त सुरुवात करत पॉइंट्स टेबलमध्ये आपली छाप सोडली आहे. काही संघांतील फलंदाज सातत्याने धावा करत आहेत. मात्र त्या संघाच्या कर्णधारांना फलंदाज म्हणून आपला ठसा उमटवता आलेला नाही. हे फलंदाज कर्णधार असल्याने त्यांना प्लेइंग ईलेव्हनमधूनही सहजासहजी हटवता येणार नाही. अशाच 5 कर्णधार असलेल्या फलंदाजाबाबत जाणून घेऊयात.
हार्दिकची वाईट स्थिती
हार्दिक पंड्या याच्याकडे आयपीएल पहिल्या सर्वात यशस्वी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हार्दिक मुंबईचं नेतृत्व करण्यात आतापर्यंत अपयशी ठरला आहे. तसेच हार्दिकला ऑलराउंडर म्हणून ना बॅटिंगने काही करता आलंय ना बॉलिंगने ठसा उमटवता आलाय.
हार्दिकने 6 सामन्यांमध्ये फक्त 97 धावा केल्या आहेत. तर 3 विकेट्स मिळवल्या आहेत. ही झाली वैयक्तिक कामगिरी. तर हार्दिक कॅप्टन म्हणून मुंबईला 7 पैकी फक्त 2 सामन्यांतच विजयी करण्यात यशस्वी ठरलाय.
ऋषभ पंत
ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व करतोय. पंतवर नेतृत्वासह फलंदाजी आणि विकेटकीपिंगची तिहेरी जबाबदारी आहे. पंतने 7 सामन्यांत 147 धावा केल्यात. तर पंतने लखनौला त्याच्या नेतृत्वात 7 पैकी 2 सामने जिंकून दिले आहेत. लखनौ पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे.
रियान पराग
रियान कर्णधार म्हणून यशस्वी ठरलाय. मात्र रियानला संघाच्या विजयात वैयक्तिक योगदान देता आलेलं नाही. रियानने राजस्थान रॉयल्सला 7 पैकी 5 सामन्यांत विजयी केलंय. मात्र रियानला या 7 सामन्यांत फक्त 81 धावाच करता आल्या आहेत.
अजिंक्य रहाणे
अजिंक्यला या मोसमात सुरुवात चांगली मिळालीय. मात्र अजिंक्यला त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयश आलंय. अजिंक्यने त्याच्या नेतृत्वात केकेआरला 7 पैकी फक्त एकाच सामन्यात विजयी केलंय. तर केकेआरचा एक सामना पावसाने वाया घालवला. केकेआर 3 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहे.
ऋतुराज गायकवाड
महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड याचा चेन्नईचा कर्णधार म्हणून चांगलाच कस लागतोय. ऋतुने चेन्नईला 7 पैकी 3 सामन्यांत विजयी केलंय. तसेच ऋतुने 7 सामन्यांत 104 धावा केल्या आहेत.
