IPL 2026 Qualifier 1 : फायनलला कोण पोहचणार? सामन्याआधीच ठरणार! जाणून घ्या कसं
IPL 2026 Qualifier 1: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांत मंगळवार अंतिम फेरीसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. मात्र या सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर ठरु शकतो. जाणून घ्या आकडेवारी.

आयपीएल 2026 स्पर्धेत (IPL 2026) मंगळवारपासून प्लेऑफ फेरीला सरुवात होत आहे. प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असे एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्लेऑफ फेरीतील पहिला सामना हा पॉइंट्स टेबलमधील अव्वल 2 संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. क्वालिफायर 1 मॅचमध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 26 मे रोजी धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला आणखी 1 संधी मिळेल. त्यामुळे या सामन्यात चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे.
टॉस ठरणार निर्णायक!
आरसीबी विरुद्ध गुजरात (RCB vS GT) यांच्यातील सामन्यात टॉस (Toss) गेमचेजिंग ठरु शकतो. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. एचपीसीए क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक राहिली आहे. त्यामुळे या सामन्यात जास्तीत जास्त धावा होताना पाहायला मिळू शकतं. मात्र लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाचा या मैदानात दबदबा असल्याचा इतिहास आहे.
क्वालिफायर 1 सामना संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं आव्हानात्मक ठरतं. त्यामुळे बहुतांश वेळा टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरुन विजयी धावांचा पाठलाग समस्या उद्भव नयेत.
आकडे काय सांगतात?
या मैदानात आतापर्यंत 19 व्या मोसमात संध्याकाळी एकूण 2 सामने खेळवण्यात आले आहेत. टॉस जिंकून फिल्डिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. त्यामुळे क्वालिफायर 1 सामन्यात नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागावा अशीच इच्छा दोन्ही संघांच्या कर्णधारांची असणार आहे. त्यामुळे आता आरसीबी टॉस जिंकणार की गुजरातला बॅटिंग आणि फिल्डिंगचा निर्णय घेण्याची संधी मिळणार? हे संध्याकाळी 7 वाजताच निश्चित होईल.
आरसीबीची जमेची बाजू काय?
दरम्यान आरसीबीने 19 व्या मोसमात या मैदानात 1 सामना खेळला आहे. तर गुजरातची क्वालिफायर 1 निमित्ताने एचपीसीए स्टेडियममध्ये या मोसमात खेळण्याची पहिली वेळ असणार आहे. आरसीबीला या मैदानात खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे आरसीबीला परिस्थितीची जाण आहे. त्यामुळे आरसीबीला गुजरात विरूद्धच्या सामन्यात या अनुभवाचा फायदा होऊ शकतो.
