टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाची जागा पक्की! सूर्यकुमार यादवच्या विकेटशी अनोखा योग
T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी सुरुवात झाली आहे. नामिबिया विरूद्धच्या सामन्यातही टीम इंडियाने जबरदस्त खेळी केली. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. असं असताना अंतिम फेरीचा योग जुळून आला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना भारतीय संघ नामिबियाविरुद्ध खेळला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात भारताची फलंदाजीची बाजू भक्कम होती. त्यामुळे भारताने 200 पार धावा केल्या. शेवटच्या दोन षटकात धडाधड विकेट पडल्या अन्यथा 250 धावा तर आरामात झाल्या असत्या. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव काही खास करू शकला नाही. दुबळ्या नामिबिया संघाविरूद्ध फक्त 12 धावा करून बाद झाला. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात क्रिझ सोडलं आणि स्टम्प आऊट झाला. पण सूर्यकुमार यादव बाद झाला आणि टीम इंडियाचं अंतिम फेरीचं तिकीट पक्कं झालं. असं आम्ही म्हणत नाही, तर हा एक योगायोग आहे. यापूर्वीही असं घडलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या मनात तसंच व्हावं अशी इच्छा आहे. भारतीय कर्णधार स्पर्धेत जेव्हा जेव्हा स्टम्प आऊट झाले तेव्हा भारताने अंतिम फेरी गाठली आहे. चला जाणून घेऊयात विचित्र पण चाहत्यांसाठी आनंदाचा योगायोग…
कर्णधार स्टम्प आऊट म्हणजे फायनलमध्ये जागा पक्की!
वनडे वर्ल्डकप 2000 सालच्या स्पर्धेत भारतीय संघ सौरव गांगुलीच्या नेतृत्वात उतरला होता. या स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा सौरव गांगुली केनिया विरूद्धच्या सामन्यात स्टम्प आऊट झाला होता. पण दुर्दैवाने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. 2011 मध्ये असा योग महेंद्रसिंह धोनीसोबत जुळून आला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात स्टम्प आऊट झाला होता. तेव्हा टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आणि विजय मिळवला. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीत असंच काहीसं रोहित शर्मासोबत झालं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा स्टम्प आऊट झाला आणि टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली. आताही सूर्यकुमार स्टम्प आऊट झाला आहे. त्यामुळे तसंच घडेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास काही सोपा नाही. साखळी फेरीतही टीम इंडियासमोर पाकिस्तानचं आव्हान आहे. तसेच या स्पर्धेत मोठा उलटफेर झालेलं पाहायला मिळत नाही. त्यामुळे सुपर 8 फेरीत तगडे संघ असतील यात काही शंका नाही. त्यामुळे सुपर 8 फेरीतून उपांत्य फेरी गाठणं आणि उपांत्य फेरीत मात देत अंतिम फेरी गाठणं हा योग जुळून येणं खूप महत्त्वाचं आहे. भारतीय साखळी फेरीत पास होईल यात काही शंका नाही. पण सुपर 8 फेरीत चांगली कामगिरी करून उपांत्य फेरीत पोहोचणं गरजेचं आहे.
