IND vs SL: पाचव्या दिवशी टीम इंडियाचा विजयाचं स्वप्न भंगणार का? हातातला सामना ड्रॉ होण्याची भीती!
Colombo Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल अशी स्थिती आहे. पण भारताचा विजयाच्या स्वप्नावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला लोळवलं आणि 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्यातही भारताकडे विजयाची संधी असून 2-0 ने क्लिन स्विप देण्याची स्थिती आहे. इतकंच काय तर 2015 आणि 2017 नंतर कसोटी मालिका विजयाची हॅटट्रीकही नोंदवता येणार आहे. कारण हा सामना श्रीलंकेच्या हातून गेला असून भारताची मजबूत पकड आहे. भारताने चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात श्रीलंकेला 290 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे भारताला 214 धावांची आघाडी मिळाली. भारताने हवामानाचा अंदाज घेऊन फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवशी वारंवार पावसाने हजेरी लावली. पण भारताने 229 धावांवर श्रीलंकेचे 6 गडी तंबूत पाठवले. आता पाचव्या दिवशी उर्वरित 4 फलंदाज झटपट बाद करून विजयी धावा करण्याचा मानस आहे. पण श्रीलंकेचं नशिब जोरदार असेल तर भारताला फटका बसू शकतो. कारण पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे श्रीलंकन संघ क्लिन स्विपच्या संकटातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
शेवटच्या दिवशी कसं असेल हवामान?
कोलंबो कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे. वेबसाईट एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, सकाळी 7 वाजता 63 टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर 8 ते 10 दरम्यान 50 टक्के पाऊस असेल. दहा वाजता खेळ सुरू होतो, पण 1 वाजेपर्यंत सलग पाऊस असेल असं बोललं जात आहे. या दरम्यान 80 टक्क्याहून अधिक पाऊस असेल. त्यानंतर दुपारी 2 ते 5 दरम्यानही पाऊस असेल. त्यामुळे कोलंबो कसोटीच्या पाचव्या दिवशी पावसाचा व्यत्यय असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचं विजयाचं स्वप्न भंगू शकते. आता पाऊस पडणार की नाही यावर पुढचं गणित अवलंबून आहे.
भारतासाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर भारतीय संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत राहिल. अन्यथा गणित कठीण होईल आता भारताचे हा सामना पकडून 9 सामने आहेत. त्यापैकी 7 सामने जिंकणं काहीही करून भाग आहे. त्यामुळे हाताशी आलेला सामना ड्रॉ झाला तर हिरमोड होईल. भारताची विजयी टक्केवारी त्या तुलनेत सुधारणार नाही. तसेच 8 गुण हातातून जातील. अशा स्थितीत हा सामना व्हायला हवा असं भारतीय क्रीडाप्रेमींची इच्छा आहे.
