कोरोना संकट कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या या विषाणूचे वर्णन चिंताजनक असे केले आहे. ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाचा वेग जास्त असल्यामुळे त्याचा देशात शिरकाव होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्राकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रापाठोपाठ आता राज्य सरकारने देखील परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेला एकही रुग्ण नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
नव्या नियमावलीनुसार एखाद्या प्रवाशाला जर परदेशातून राज्यात यायचे असल्यास त्याला त्याने गेल्या 15 दिवसांमध्ये कुठेकुठे प्रवास केला होता, त्याचा तपशील सादर करणे बंंधनकारक करण्यात आले आहे. चुकीचा तपशीर सादर केल्यास संबंधित प्रवाशावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आला आहे. ज्या देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झाला आहे, अशा देशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची व्यवस्था वेगळी करण्यात येणार आहे. आरटीपीसीआर चाचणी झाल्यानंतरच त्यांना विमानतळाच्या बाहेर पडता येणार आहे. चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येईल किंवा 14 दिवस होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.