जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचं आणि सरकारमधील घटकपक्षांचं कौतुक केलंय. ‘व्यासपीठावर अजितदादांना बोलताना मी म्हटलं की, बऱ्याचदा काय होतं की शेवटी बोलणारा जो वक्ता असतो त्याची पंचाईत होते. कारण आधीच्या सगळ्या खेळाडूंनी चौकार, षटकार मारुन, विकेट घेऊन मॅच जिंकलेली असते. शेवटी कॅप्टनला मग मैदान साफ करायला जावं लागतं, तशी माझी परिस्थिती झाली आहे. पण मॅच जिंकल्याचा आनंद नक्कीच आहे. असे सहकारी मिळाल्यानंतर काम होणार कसं नाही, ते झालंच पाहिजे’, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं कौतुक केलंय.