मुंबई : महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अजूनही कायम आहे. आज मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने पुढील सुनावणीपर्यंत कामगार संघटनांसोबत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा. आंदोलना दरम्यान हिंसक घटना घडल्यास पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. जे कर्मचारी कामावर रूजू होण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यावर इतर संघटनांनी दबाव टाकू नये. कोरोना काळात दीड वर्ष शाळा बंद होत्या. आता शाळा सुरू झाल्या असून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. मात्र आमच्या मागणीसंदर्भात योग्य तो निर्णय येईपर्यंत संप मागे घेणार नाही, कर्मचारी संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.