Ajit Pawar NCP : विनाकारण मुंबईत फिरू नका… राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांची आमदारांना तंबी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांनी सर्व आमदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याची तंबी दिली आहे. मुंबईत विनाकारण न थांबता मतदारसंघात सक्रिय राहून पक्षाची कामे करण्याचे आणि ताकद दाखवण्याचे आदेश त्यांनी दिले. काही संपर्कमंत्र्यांच्या निष्क्रियतेबद्दलही पवारांनी नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आमदारांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. अजित पवार यांनी आमदारांना विनाकारण मुंबईत न थांबता आपापल्या मतदारसंघात परत जाऊन पक्षाची कामे सक्रियपणे करण्याची सूचना केली. “मतदारसंघात फिरा, पक्षाची ताकद दाखवा आणि जनतेशी संपर्क साधा,” असे ते म्हणाले.
या बैठकीत अजित पवारांनी संपर्कमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्र्यांनी सक्रिय राहून पक्षाची कामे करावीत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. “सुमारे 50 टक्के संपर्कमंत्री त्यांचे काम प्रभावीपणे करत नाहीत,” अशी खंतही पवारांनी व्यक्त केली. आगामी निवडणुका लक्षात घेता, पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्व आमदारांनी आणि नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन अजित पवारांनी यावेळी केले. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.
