Bachchu Kadu : येत्या 16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता… बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना आजही फोन करून उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली आहे. तर आज मंत्री उदय सामंत हे देखील बच्चू कडू यांची भेट घेणार आहे. त्यांनतर बच्चू कडू आपली भूमिका घेणार आहेत. मात्र बच्चू कडू अजूनही अन्नत्याग आंदोलनावर कायम आहेत.
सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास येत्या 16 तारखेपासून आता अन्नत्यागच नाहीतर पाणी त्याग करण्याची आमची मानसिकता झाली आहे, तशा कार्यकर्त्यांच्या भावना आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित न करता आणखी तीव्र करण्याचा निर्णय जाहीर केलाय. बच्चू कडू म्हणाले, आजही मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन केला. ते म्हणाले आम्ही कर्ज माफी नक्की करू, थोडा वेळ घ्या, उच्चस्तरीय समिती लवकरच गठीत करण्यात येईल. परंतु समिती केव्हा गठीत करणार आणि केव्हा कर्जमाफी होणार हे सांगितलं पाहिजे.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असं आवाहन बच्चू कडू यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना केलं असून ते पुढे असेही म्हणाले की, हे कार्यकर्ते काल अजित दादांच्या घरावरही आंदोलन करणार होते पण त्यांना मी थांबवलंय. ज्या ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्व लोकांशी चर्चा करून दुपारी दोन वाजता आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
