BJP-Shinde Sena Alliance : प्रचार टोकाला थेट युतीचं भविष्य फक्त 2 तारखेपर्यंतच..! भाजप-शिंदे सेनेच्या युतीत खटके, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

| Updated on: Nov 29, 2025 | 11:09 AM

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या "दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे" या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंनी युतीचा भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा वाद युतीच्या अस्तित्वापर्यंत पोहोचला असून, एकनाथ शिंदे यांनी युती विचारांवर आधारित असल्याचे म्हटले आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता चव्हाट्यावर आला असून, युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे” असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी “दोन तारखेनंतरही युती टिकवायची आहे का?” असा प्रतिप्रश्न केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या.

दुसरीकडे सिंधुदुर्गात शिंदेंचे आमदार निलेश राणे यांनी चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला होता, त्यानंतर चव्हाणांचे हे वक्तव्य आले. सिंधुदुर्ग, पालघर आणि अंबरनाथमध्ये दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही युती बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेल्या विचारधारेवर आधारित असून, ती कायम राहील असे स्पष्ट केले आहे. मात्र, या घटनांमुळे भाजप आणि शिंदे सेनेतील संबंधात सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

Published on: Nov 29, 2025 11:09 AM