40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले होते. यावर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना खुलं आव्हान दिले आहे. शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या 40 आमदारांवर टीका करण्याऐवजी त्यांनी स्वतः आधी निवडणूक लढवून दाखवावी. साधं नगरसेवक तरी होऊन दाखवावं. स्वाभिमान असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावे, असे वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केले आहे. दरम्यान, आता प्रतापराव जाधव यांनी दिलेल्या या आव्हानानंतर संजय राऊत हे आव्हान स्वीकारणार का? याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.
संजय राऊतांनी एकही निवडणूक लढवलेली नाही. नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याची हिंमतही त्यांच्यात नाही. इतक्या हिंमतीने ते बोलत असतील तर याच 40 आमदारांच्या भरोश्यावर ते राज्यसभेचे खासदार बनले आहेत. त्यामुळे आधी स्वतःचा स्वाभिमान जागृत करावा, असेही त्यांनी राऊतांना सुनावले आहे.