Devendra Fadnavis : पालकमंत्र्यावाचून काही अडलंय का? ते येत-जात राहतात – मुख्यमंत्री फडणवीस
CM Fadnavis On Kumbhamela : कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या बैठकीसाठी आज मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाष्य केलं आहे.
पालकमंत्र्यांमुळे काही अडलंय का? पालकमंत्री येत-जात राहतात, हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचे आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. आज नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भूसे यांच्यासह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील 13 आखाड्याच्या प्रमुखांची या बैठकीला उपस्थिती होती. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी कुंभमेळ्याचा मुहूर्त लागला, आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी पालकमंत्री येत-जात असतात असं उत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत झाले. तसेच साधूग्रामची जागा अधिग्रहण करायची असून, त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल. पालकमंत्री आणि अमृत स्नानाचा काय संबंध? अमृत स्नान हे लाखो वर्षांपासून चालू आहे. पालकमंत्री जातात, येतात, राहतात. हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकमंत्र्यावाचून काही अडलं आहे का? कुंभमंत्री आहेत. ते सगळं करतील. काही काळजी करू नका, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.
