Gopichand Padalkar : जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रातोरात कोणी बदललं? पडळकरांकडून गंभीर आरोप, कवडीमोल भावात…
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याशी संबंधित सांगली जिल्ह्यातील जत येथील साखर कारखान्याचा नामफलक अज्ञात व्यक्तींनी रातोरात बदलला आहे. भाजपनेते गोपीचंद पडळकर यांनी पाटलांवर हा कारखाना कवडीमोल भावात खरेदी केल्याचा आरोप करत, तो सभासदांना परत करण्याची मागणी केली आहे. यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या साखर कारखान्याच्या नामफलकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या या कारखान्याचा नामफलक अज्ञात व्यक्तींनी रातोरात बदलला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पडळकर यांच्या म्हणण्यानुसार, जयंत पाटील यांनी हा कारखाना कवडीमोल भावात विकत घेतला असून तो पुन्हा सभासदांच्या नावावर करण्यात यावा. पूर्वी राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना असे नाव असलेल्या या कारखान्याची विक्री झाल्यानंतर त्याचे नाव राजारामबापू सहकारी साखर कारखाना असे करण्यात आले होते.
मात्र, आता रातोरात राजारामबापूंच्या नावाची पाटी उतरवण्यात आली आहे. दुष्काळामुळे बंद पडलेल्या या कारखान्याची विक्री राज्य शिखर बँकेकडून लिलावाद्वारे झाली होती, ज्यात जयंत पाटलांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याने 47 कोटी 86 लाख रुपयांना तो विकत घेतला होता. जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील जुना वाद या निमित्ताने पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
