Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
मुंबईलगतच्या नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वसई-विरार महानगरपालिका मुख्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईलगतच्या नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वसई-विरार महानगरपालिका मुख्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पाणी उपसून वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील धुकटन परिसरात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान झाले आहे.
भिंत कोसळल्यानंतर घरातील अन्नधान्य, कपडे आणि दैनंदिन वापरातील वस्तू पावसाच्या पाण्यात भिजल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर स्थानिक यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
