Jalgaon : मृत महिलेचे पाय अन् कवटी स्मशानातून गायब, जळगावात सगळेच हादरले! ‘त्या’ रात्री नेमकं घडलं काय?

Jalgaon : मृत महिलेचे पाय अन् कवटी स्मशानातून गायब, जळगावात सगळेच हादरले! ‘त्या’ रात्री नेमकं घडलं काय?

Harshada Shinkar | Updated on: Oct 13, 2025 | 4:09 PM

जळगावमधील एका हृदयद्रावक घटनेत, जिजाबाई प्रताप पाटील यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांची कवटी आणि पायाची हाडे स्मशानभूमीत गायब झाल्याचे उघड झाले. अस्थी न मिळाल्याने कुटुंबीय शोकाकुल असून, योग्य धार्मिक विधी करता न आल्याचे दुःख आहे. दागिने किंवा जादूटोणा हे चोरीचे संभाव्य कारण मानले जात आहे.

जळगावमध्ये एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिजाबाई प्रताप पाटील नावाच्या मृत महिलेच्या अस्थी गोळा करण्यासाठी कुटुंबीय स्मशानभूमीत गेले असता ते चांगलेच हादरले आहे.  कुटुंबीय स्मशानभूमीत अस्थी घेण्यासाठी गेले असताना त्यांना त्या मृत महिलेची कवटी आणि पायाची हाडे गायब झाल्याचे निदर्शनास आले. 11 ऑक्टोबर रोजी जिजाबाई पाटील यांचे निधन झाले होते.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्थी विसर्जनासाठी आलेल्या शुभम मंगल पाटील यांनी ही बाब उघडकीस आणली. त्यांच्या मते, मृत महिलेच्या अंगावरील दागिने, विशेषतः कानातले आणि पायातील जोडवे घेण्यासाठी चोरट्यांनी ही कवटी आणि हाडे चोरली असावीत. तर या घटनेनंतर जादूटोण्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना धार्मिक विधी पूर्ण करता येत नसल्याने प्रचंड दुःख झाले आहे. त्यांनी प्रशासनाकडे स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे, लाईटची व्यवस्था करावी आणि सुरक्षा रक्षक नेमून सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी केली आहे.

Published on: Oct 13, 2025 4:09 PM
Follow Us