राज्यसभा निवडणुक तोंडावर आली आहे. त्यामुळे आपले आमदार फूटू नयेत म्हणून काँग्रेसने तयारी सुरू केलीये. उद्या बॅगा भरून मुंबईत येण्याचे आदेश आमदारांना देण्यात आले आहेत. त्यामध्येही चार ते पाच दिवसाचे कपडेही घेऊन यायला सांगितले. राज्यसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, म्हणून या उपायोजना केल्या जात आहेत. या सर्व आमदारांची एका बड्या हॉटेलात राहण्याची व्यवस्था केली जाणार असून त्यांना कुणालाही संपर्क करू दिला जाणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादीकडूनही आमदारांना सूचना दिल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आणि अपक्ष आमदारांची संध्याकाळी बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री स्वत: या आमदारांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आमदारांच्या समस्याही ते जाणून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.