Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल

| Updated on: Aug 08, 2026 | 4:09 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांबाबत होत असलेल्या कारवाईवरून त्यांनी सरकारला थेट सवाल केला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांबाबत होत असलेल्या कारवाईवरून त्यांनी सरकारला थेट सवाल केला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“मी झुंज कोणासाठी देतोय? सर्व पक्षातल्या मराठ्यांच्या लेकी-बाळींचं वाटोळं करायला लागलेत,” असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सख्ख्या आणि चुलत भावाचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा दावा करत, “जात पडताळणी समितीचा निर्णय आहे, मग दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र कसं रद्द होतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात आपल्याकडे काही पत्रे असल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी केला. एकनाथ शिंदे यांचे पत्र असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची वैधता तपासण्याची मागणी केली. तसेच “हे बावनकुळेंचं पत्र आहे, मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून,” असा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, गेल्या वर्षभरात आपण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कधीही टीका केली नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. गरीब मराठ्यांचे कल्याण व्हावे, या उद्देशाने आपण राजकीय हस्तक्षेप टाळला. सरकारमधील विविध नेते या विषयात पुढे आले तरी आपण त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही, असे त्यांनी सांगितले. “मला वाटलेलं गरीबाचं कल्याण होईल. मी राजकीय ढवळाढवळ केली नाही,” असे जरांगे पाटील म्हणाले. मात्र, आता सरकारच्या भूमिकेबाबत आपल्या मनात प्रश्न निर्माण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या मूळ नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी असल्याचे सांगत, या नोंदी रद्द कशा होऊ शकतात, असा सवाल त्यांनी केला. “यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत,” असा आरोप करत त्यांनी मराठा समाजाला सावध राहण्याचे आवाहन केले. “जरांगे पाटील पक्कं आरक्षण द्यायला लागलाय, म्हणून मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवा,” असा आरोपही त्यांनी केला. मराठा समाजातील सर्वांनी एकत्र यावे आणि राजकारण नंतर करावे, असे आवाहन करत जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या या आरोपांवर राज्य सरकार आणि संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागले आहे.

Published on: Aug 08, 2026 4:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us