नाशिक : नाशिकमधील निफाड तालुक्यातील शिरसगावमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेराव घातला. दरम्यान, जागतिक पातळीवर जे भाव असतील त्या भावाने कांदा खरेदी करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यावर भारती पवार म्हणाल्या, मी नाफेडची खरेदी करण्यासाठी आग्रह केला. तुम्ही विरोध करत आहात. आजपर्यंत सरकार लाल कांदा खरेदी करत नव्हतं. आता तो आम्ही खरेदी करत आहोत. केंद्र सरकारनं पहिल्यांदा लाल कांदा खरेदी करण्याचा हा निर्णय आहे. जागतिक पातळीवर मागणी नाही. लाल कांदा हा लवकर खराब होतो. शेतकरी संघटनेनं निवेदन द्यावं की, नाफेड काही कामाचं नाही. आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असंही भारती पवार यांनी सांगितलं. आज त्या लासलगाव येथील नाफेड कांदा खरेदी केंद्रावर कांदा खरेदीच्या पाहणीसाठी आल्या होत्या. पत्रकारांनी विचारलेला प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या.