Raj Thackeray : तो लाकूडतोड्या बरा होता, तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना खोचक टोला

Raj Thackeray : तो लाकूडतोड्या बरा होता, तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना खोचक टोला

| Updated on: Jan 09, 2026 | 8:56 PM

राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीवरून गिरीश महाजन आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. २०१२ च्या यशस्वी कुंभमेळ्यावेळी एकही झाड कापले नव्हते, पण आता उद्योगपतींसाठी जागा खाली केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. फडणवीसांच्या दत्तक नाशिक आश्वासनावरही त्यांनी टीका केली.

राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवनात सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून गिरीश महाजन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांच्या विधानाचा संदर्भ देत, त्यांनी तपोवनातील झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले. झाडे तोडण्याआधी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना छाटले आणि बाहेरून माणसे पक्षात आणली, असे राजकीय आरोपही त्यांनी केले. २०१२ साली जेव्हा आम्ही सत्तेत होतो, तेव्हा कुंभमेळा अत्यंत यशस्वी झाला होता आणि त्यावेळी एकही झाड कापले गेले नव्हते, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधले. त्यावेळी प्रशासक आणि नगरसेवकांचा बॉस्टन, अमेरिकेतही सत्कार झाला होता. आता वृक्षतोड का केली जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही झाडे नुसती तोडणे नसून, उद्योगपतींसाठी जागा रिकामी करण्याचा हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा त्यांनी केला. कुंभमेळा संपल्यावर ही जमीन उद्योजकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.

Published on: Jan 09, 2026 08:56 PM