गेल्या दोन अडीच वर्षापासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला असून नवी मुंबईतील अनेक भागात रसायनानी भरलेले टँकर गल्लोगल्ली दिसत आहेत. त्या एखाद्या टँकरचा अनावधाने स्फोट झाला तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते आणि हे सगळं कुणाच्या जीवावर चालू आहे, या गोष्टीला कोण अधिकारी जबाबदार आहेत याची सर्व माहिती मी सभागृहाला दिली असल्याची माहिती भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सभागृहात दिली. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी ही बाब मुख्यमंत्री आणि गृहराज्य मंत्री यांच्या कानावर घातली होती, मात्र त्यावेळीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे आता तरी शिवसेना-भाजपचे सरकार याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. नवी मुंबई, पनवेल, ऐरोली या भागात एखादी मोठी दुर्घटना घडल्यानतंरच आपण याकडे लक्ष देणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.