पवारांची जेवढी चावी तितकं जरांगेचं इंजिन टुकटुक करतं… मुंबईच्या आंदोलनावरून कोणी डिवचलं? एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा
मनोज जरांगेला सुद्धा मुख्यमंत्री केलं तर त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, ते राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी एकेरी भाषेत बोलतात, अशी घणाघाती टीका नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली
येत्या २९ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा देत ते मुंबईत धडकणार आहे. यावर नवनाथ वाघमारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘जरांगे हे मुंबईला जात आहेत मात्र पूर्वीसारखं वाशीवरून जसे वापस आले तसं वाशीच्या अगोदरच वापस येऊ नये. जरांगे पाटलांना समाजाशी काहीही घेणेदेणे नाही, जो समाज जरांगे पाटलांसोबत आहे तो समाज भावनिक आहे. त्यांना अजून माहिती नसेल की जरांगे पाटील आपल्याला फसवणार आहे’, असं म्हणत वाघमारेंनी जरांगेंवर निशाणा साधलाय.
तर शरद पवारांनी जेवढी चावी दिली तितकं जरांगेचं इंजिन टुकटुक करतं, एकनाथ शिंदे हे सुद्धा आता जरांगे पाटलांना चावी देण्याचे काम करत असल्याची टीका नवनाथ वाघमारे यांनी केली. पुढे ते असंही म्हणाले की, जरांगे सारखा बालिश आणि बाल हट्ट करणारा आंदोलक समोर करायचा त्या माध्यमातून सरकारमध्ये राहूनच सरकारला वेठीस धरण्याचं एकनाथ शिंदेच प्रयत्न आहे. जरांगे यांचे मूळ मालक शरद पवार आहेत रोहित पवार आहेत राजेश टोपे आहेत आणि काँग्रेस मधले सुद्धा काही खासदार आमदार आहेत, असे म्हणज जिव्हारी टीकाही वाघमारे यांनी केली.
