लखीमपूर हिंसाप्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बंद पूर्वीच राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने उद्याचा बंद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. उद्याच्या बंदमध्ये जनता सहभागी होईल आणि केंद्राच्या जुल्मी कारवाईचा निषेध करेल. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. मात्र, संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठी उभा आहे, असं सांगतानाच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या प्रकरणात हात असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने त्यानंतर मिश्रा यांच्या मुलाला अटक झाली. गृहराज्यमंत्र्यांच्या गावात ही घटना घडली. त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले. त्यामुळे मिश्रा यांनी राजीनामा दिला पाहिजे. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं मलिक म्हणाले.