Ashadhi Wari : वारकऱ्यांशी अरेरावी? आनेवाडी टोल नाक्यावर सक्तीने टोल वसूली
आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या वाहनांना सरकारने टोलमाफी दिलेली आहे. मात्र असे असतानाही आनेवाडी टोल नाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत टोल वसुली करण्याचा कारनामा केला आहे.
सातारा : संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून अनेक वारकरी जातात. यावेळी ते आपल्या वाहणातून जाणे पसंत करतात. तर हजारो वाहने पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गाने नेतात. म्हणून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या वाहनांना सरकारने टोलमाफी दिलेली आहे. मात्र असे असतानाही आनेवाडी टोल नाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत टोल वसुली करण्याचा कारनामा केला आहे. येथे आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांना टोल वसूलीसाठी अडवल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले. टोल वसुलीवरून वारकरी आणि टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर वारकऱ्यांनी याबाबत तिव्र नाराजी व्यक्त करत तेथेच भजन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथे काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. तर टोल नाका कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. तर या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसूल केला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.
