पुणे : एका बाजूला मराठी माणूस, हिंदुत्वाबद्दल भूमिका मांडायची. तेव्हा मनसेने (MNS) आता परप्रांतीयांबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केली आहे. तर पहिले त्यांचे भोंगे काढा मग आम्ही भोंगे काढू, असे होणार नाही. सर्वांना समान कायदा लागू होईल, असे यावेळी सचिन अहिर म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. जसे राणा दाम्पत्य असेल अथवा अन्य कोणी त्या सर्वांना कायदा लागू होतोच. तेव्हा कोणी चूक केल्यास कारवाई होणारच, असेही सचिन अहिर यांनी सांगितले. हिंदुत्व आणि राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका यावर त्यांनी सडकून टीका केली. त्यांच्या भूमिकेमुळे अनेक ठिकाणी काकड आरती आणि धार्मिक कार्यक्रमावेळी लाऊडस्पीकर लागले नाहीत किंवा ते कार्यक्रम झाले नाहीत, काय मिळवले हे करून, असा सवाल सचिन अहिर यांनी केला आहे.