उत्तर प्रदेशातील लखीमपूरला जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आम्हाला मारून टाका, गाडून टाका, आम्हाला वाईट वागणूक द्या, त्याने काही फरक पडत नाही. आमची ट्रेनिंग अशीच आहे. मुद्दा शेतकऱ्यांचा आहे. आम्ही त्यावर बोलतच राहणार, असं सांगतानाच लखीमपूरला जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असं राहुल गांधी यांनी आज सकाळी स्पष्ट केलं. दरम्यान, आता अशी माहिती मिळाली आहे की, राहुल गांधी लखीमपूरकडे रवाना झाले आहेत.
राहुल गांधी लखीमपूरला रवाना झाले आहेत. मात्र, त्यांना उत्तर प्रदेशातील योगी सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या देशात शेतकऱ्यांवर हल्ला होत आहे. त्यांनी जीपखाली चिरडले जात आहे. मंत्र्यांवर कारवाई केली जात नाही. यापूर्वी त्यांची शेती हिसकावून घेतली गेली. तीन कृषी कायदे बनविण्यात आले. त्यामुळेच शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे, असं राहुल गांधी म्हणाले.