Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं…
विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवरून निर्माण झालेला वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचला असून, या प्रकरणावर नार्वेकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या मराठी उच्चारांच्या चुका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यानंतर विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवरून निर्माण झालेला वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचला असून, या प्रकरणावर नार्वेकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या मराठी उच्चारांच्या चुका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यानंतर विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर नार्वेकर यांच्या वाचनशैलीवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्षांवर जोरदार निशाणा साधत त्यांना मराठी भाषा नीट वाचता, लिहिता आणि बोलता येत नसल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट करत झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली. ते म्हणाले, “शोकप्रस्तावाच्या वाचनादरम्यान काही तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. सुरुवातीला आवश्यक त्या दुरुस्त्या झाल्या नव्हत्या आणि मजकूर जशाच्या तसा वाचला गेला. ही चूक माझ्याकडून घडली, याची मी कबुली देतो.”
नार्वेकर यांनी पुढे सांगितले की, “गेल्या चार वर्षांपासून मी या सभागृहाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. या काळात मी अनेक भाषणे आणि शोकप्रस्ताव मराठीतून मांडले आहेत. सभागृहाचे नियम, कार्यपद्धती आणि कामकाजही मी सातत्याने मराठी भाषेतच हाताळले आहे. मराठी भाषेबद्दल या सभागृहाला जितका अभिमान आहे, तितकाच अभिमान मलाही आहे.”
यावेळी त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत, “जे घडलं ते चुकीचं घडलं. माझ्या वाचनामुळे राज्यातील किंवा सभागृहातील कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे सांगितले.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्या या स्पष्टीकरणानंतर आणि दिलगिरीनंतर हा वाद शांत होणार की विरोधकांकडून आणखी प्रतिक्रिया उमटणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
