Raj Thackeray : वडिलांचं वय मुलापेक्षा कमी कसं? अन् 2-2 ठिकाणी नावं… मतदार याद्यांच्या घोळावरून राज ठाकरेंनी आयोगाला घेरलं
राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन-दोन ठिकाणी मतदारांची नावे कशी, असा सवाल त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत विचारला. उद्धव ठाकरे यांनीही निवेदन दिले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने शंका उपस्थित करत, मतदार याद्यांची पारदर्शकता राखण्याची मागणी केली.
महाराष्ट्रामध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित घोळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत राज ठाकरे यांनी ‘दोन-दोन ठिकाणी मतदारांची नावे कशी?’ असा सवाल करत निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका व्यक्त केली.
या बैठकीत केवळ राज ठाकरेच नव्हे, तर उद्धव ठाकरे यांच्या हस्तेही निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसे? असे प्रश्न विचारत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. मनसेने आपल्या पदाधिकाऱ्यांना मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने या गंभीर मुद्द्यांवर तातडीने लक्ष देऊन मतदार याद्यांची पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे.
