खासदार फोडणं, आमदार फोडणं… राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडींवर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडींवर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या पक्षांतराच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. खासदार, आमदार आणि नगरसेवक फोडण्याच्या राजकारणामुळे लोकशाही व्यवस्थेचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे म्हणाले की, राज्यासमोर दुष्काळासारखी गंभीर आव्हाने उभी आहेत, मात्र त्याऐवजी राजकारणात लोकप्रतिनिधी फोडण्याच्या घडामोडींनाच अधिक महत्त्व दिले जात आहे. यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच, निवडणुकीत जनतेने विश्वासाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नंतर पक्षांतर करत असतील, तर याचा गंभीरपणे विचार मतदारांनी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांनी मतदानासाठी तासन्तास रांगेत उभे राहून निवडून दिलेले प्रतिनिधी नंतर वेगळी भूमिका घेत असतील, तर अशा नेत्यांना पुन्हा संधी द्यावी का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे भविष्यातील पिढ्यांसमोर कोणता आदर्श ठेवला जात आहे, याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील पक्षांतराच्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
