Raju Shetty : माधुरीचा वाद सुरू असतानाच राजू शेट्टींकडून अनंत अंबानीचं कौतुक, असं काय म्हणाले…?

Raju Shetty : माधुरीचा वाद सुरू असतानाच राजू शेट्टींकडून अनंत अंबानीचं कौतुक, असं काय म्हणाले…?

Harshada Shinkar | Updated on: Aug 08, 2025 | 2:00 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्तीण 'माधुरी' हिच्या संदर्भातला वाद अखेर मिटल्याचे वृत्त आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतला, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची हत्तीण माधुरीचा वाद सुरू असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून एक मोठी माहिती देण्यात आली आहे. माधुरीचा सुरू असलेला वाद आता संपला असल्याचे वक्तव्य राजू शेट्टींनी केलं. गुजरातच्या जामनगरमध्ये असलेलं वनतारा प्राणी संवर्धन केंद्र माधुरीसाठी कोल्हापुरातील नांदणी मठात केंद्र उभारून तिचे उपचार करणार असल्याचे राजू शेट्टी यांच्याकडून सांगण्यात आलंय. तर ही माहिती देत असताना राजू शेट्टी यांनी अनंत अंबानी यांचं कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. ‘वाद मिटवण्यासाठी अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे’, असं राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान, या वादामध्ये, नांदणी मठाची हत्तीण माधुरी हिला उपचारांसाठी वनतारा या संस्थेत नेण्यात आले होते. यावर, काही स्थानिक लोकांनी आणि पशु-हक्क संघटनांनी आक्षेप घेतला. त्यांचा असा दावा होता की, माधुरी हत्तीणला वनतारा येथे योग्य उपचार मिळणार नाहीत आणि तिला कोल्हापूरमधून हलवू नये. यावरून वातावरण तापले होते आणि स्थानिक पातळीवर मोठे आंदोलनही झाले होते. आता, या वादावर तोडगा काढताना, वनतारा प्रशासनाने नांदणी जैन मठाला आश्वासन दिले आहे की, माधुरी हत्तीणीला वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नांदणी मठाच्या परिसरातच एक सेंटर उभे केले जाईल.

Published on: Aug 08, 2025 2:00 PM
Follow Us