मुंबई : आजच्या सामनातून रामनाम आणि हिंदुत्व या मुद्द्यावरून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. “अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहत आहे. सर्व काही शांततेत सुरू असताना पुन्हा रामाच्या नावाने हिंसा घडवणे हे षडयंत्र आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची ही दळभद्री योजना आहे. देश लुटणाऱ्या अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे. रामनवमीच्या निमित्ताने जे घडले ते ‘रामनाम सत्य’ नसून रामनामाची बदनामी आहे. राम हे मर्यादापुरुषोत्तम होते, पण त्यांच्या नावाने दंगा करणाऱ्यांनी मर्यादाच ओलांडल्या. राम जीवनाचा हिस्सा आहे. जीवनाचा हिस्सा असा हिंसक होऊन कसे चालेल? पण देशात तेच चालले आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.