Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
राज्यातील राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडली असून विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडली असून विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेत प्रवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, तळागाळातील कार्यकर्त्यालाही मोठी संधी मिळू शकते, हे एकनाथ शिंदे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. उपसभापतीपदासाठी माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेची कामे करण्यासाठी मी त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपसभापतीपदाची परंपरा आणि प्रतिष्ठा कायम राखण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी रासू गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांसारख्या माजी उपसभापतींच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ग्रामीण भागात आणि पक्ष कमकुवत असलेल्या भागांत संघटन बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना सचिन अहिर म्हणाले की, राजकीय आरोपांना योग्य वेळी योग्य व्यासपीठावर उत्तर देईन. “जोपर्यंत आपण सोबत असतो, तोपर्यंत चांगले असतो आणि वेगळा निर्णय घेतला की नालायक ठरवले जाते, ही भूमिका दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली आहे. विधानसभा, महापालिका आणि जनतेसाठी केलेले काम संबंधित नागरिकांना माहीत आहे. काही जणांना आम्हीच सर्व काही आहोत असे वाटत असले, तरी माझ्या कामाचा निर्णय जनता देईल, असेही सचिन अहिर यांनी नमूद केले.
