Sanjay Raut Press: मी कान नाही टोचले, मी फक्त…; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवरून भाजपवर सडकून टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्या की राष्ट्रवादी भूमिका घेणारे भाजप नेते पैशांसाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतात, असा आरोप त्यांनी केला. या बेटिंगमधून मिळणारा पैसा दहशतवाद्यांना जातो, असे राऊत म्हणाले. तसेच टिपू सुलतान वादावरही भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सामना पाहताना नाही तर निवडणुका जवळ आल्यावर भाजप राष्ट्रभक्ती आणि हिंदू-मुसलमान असा मुद्दा समोर आणतो. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा भाजपचा खेळ असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले की, पैशांचा विषय येतो तेव्हा जय शहांना भारत आणि पाकिस्तान सामने खेळायला परवानगी दिली जाते. या सामन्यांवरील बेटिंगमधून हजारो कोटी रुपये पाकिस्तानला जातात आणि तो पैसा दहशतवाद्यांना मिळतो, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्याचा संदर्भ देत भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानते, तर भाजप टिपू सुलतानवर टीका करते, मग त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निषेध भाजप का करत नाही, असा सवाल त्यांनी विचारला. अलिबागमध्ये गुजरात लॉबीद्वारे भूखंड खरेदीचा आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही त्यांची मते लोकांच्या भावना व्यक्त करतात, असे राऊत म्हणाले.
