अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक खवळले असून त्यांनी मातोश्रीबाहेर घेराबंदी केली आहे. त्यामुळे वांद्रे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी नवनीत राणा आणि भाजपवर (bjp) टीका केली आहे. आम्हाला राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका. आय रिपीट. पुन्हा सांगतो. राष्ट्रपती राजवट लावाच. आताच माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. बायकांच्या आडून भाजप जे शिखंडीचे प्रयोग करत आहे ते बंद करा, असं सांगतानाच राऊत यांनी तृतियपंथीयांशी संबंधित एक शब्द वापरून भाजपवर जहरी टीका केली. केंद्रीय पोलीस दलाचा वापर करून आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आमच्या संरक्षणासाठी पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक सक्षम आहेत. शिवसैनिक सदैव मरायला आणि मारायला तयार असतो, असं सांगतानाच सरकार आमचं असल्याने आमचे हात नक्कीच बांधलेले आहेत, असंही ते म्हणाले.