Sanjay Raut | जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल; मेट्रो अपघातावरूनही साधला निशाणा
भारतीय जनता पक्षाकडून नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा तसेच टिपू सुलतान यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली.
भारतीय जनता पक्षाकडून नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा तसेच टिपू सुलतान यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सपकाळ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजप कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि नोकरदारांचे प्रश्न यावर भाजपने कधी आंदोलन केले आहे का?, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबईतील मेट्रो अपघाताचा संदर्भ देत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला, “मेट्रोचा पूल कोसळून लोकांचा मृत्यू झाला, हे त्यांचेच पाप आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, हिंदू-मुस्लिम वादाला खतपाणी घालणारे मुद्दे निर्माण करून लोकांचे लक्ष भरकटवले जात असल्याची टीकाही राऊतांनी यावेळी केली.
