Saamana : धरलं तर चावतंय अन् सोडलं तर… बहिणींची ‘लाडकी’ योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी ‘दोडकी’
विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी 'लाडकी बहीण' योजनेचा मोठाच गवगवा केला होता. त्याचा राजकीय लाभदेखील त्यांना निवडणुकीत झाला. मात्र ही योजना राज्याची आर्थिक घडी बिघडविणार, ती राबविताना सरकारच्या नाकीनऊ येणार असे इशारे त्याच वेळी दिले गेले असल्याचे समानातून म्हटलंय.
लाडक्या बहिणींना द्यायच्या अनुदानाची जुळवाजुळव ही सरकारसाठी आणि त्यासाठी इतर खात्यांमधून केली जाणारी निधीची पळवापळव ही मंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे, असं सामनातून म्हटलंय. तर अजितदादांच्याच गटाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही निधी उभारण्याची डोकेदुखी आता जाहीरपणे बोलून दाखवली. भरणे यांच्या या वेदनेवर अजितदादा कोणती ‘गोळी’ देऊन फुंकर घालतात हे दिसेलच, पण बहिणींसाठी ‘लाडकी’ ठरलेली ही योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी मात्र ‘दोड़की’ ठरू लागली आहे, हे नक्की. धरले तर चावते अन् सोडले तर पळते, अशी स्वतःच स्वतःची अवस्था करून घेणाऱ्यांबद्दल काय बोलायचे, हा प्रश्न असला तरी त्यामुळे राज्याच्या आर्थिक शिस्तीची वासलात लागत आहे त्याचे काय? असा सवाल सामनातून करण्यात आलाय.
राज्याचे एक मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही ‘लाडकी बहीण’ योजना सरकारच्या डोक्यावरील ‘भार’ झाल्याची जाहीर कबुली दिली आहे. ज्यांनी तक्रार केली ते भरणे आणि ज्यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला ते भुजबळ हे दोघे अजितदादा गटाचे आहेत. योजनेत चूक झाली हे दादांनीच मान्य केलं होतं मात्र ही चूक दरमहा करावी लागत असल्याने राज्याचे आर्थिक गणित चुकू लागलंय, असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
