Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. महिलांना घरगुती चक्क्यांचे वाटप केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. महिलांना घरगुती चक्क्यांचे वाटप केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली.
भाजपने इतर पक्षांतील नेते फोडण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि युवा नेतृत्व घडवावे, असा सल्ला त्यांनी दिला. भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेमध्ये अनेक सक्षम कार्यकर्ते असून त्यांना संधी देण्याऐवजी इतर पक्षांतील नेत्यांना पक्षात घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली.
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेले असतानाही याविरोधात कोणी आवाज उठवत नसल्याचे त्या म्हणाल्या. कोकणातील चिपी विमानतळाचा मुद्दा उपस्थित करत हजारो कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या विमानतळांचा योग्य वापर होत आहे का, असा सवाल त्यांनी केला.
पर्यावरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी वृक्षतोडीबाबत चिंता व्यक्त केली. शेकडो वर्षे जुनी झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाचा विलंब आणि भूजल पातळीतील घट यांसारख्या समस्या वाढत असल्याने सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
