26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले होते. मात्र, केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या आश्वासनांच्या आधारे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले होते. मात्र, केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या आश्वासनांच्या आधारे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतली. या बैठकीत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सरकारने काही अटी मान्य केल्याचे सांगत सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचूक म्हणाले, “हे पाऊल अनेक अटी, दीर्घ चर्चा आणि देशात संभाव्य हिंसाचार टाळण्याच्या दृष्टीने उचलण्यात आले आहे. लवकरच मी व्हिडिओद्वारे सरकारने मान्य केलेल्या अटींबाबत सविस्तर माहिती देईन. सर्वांनी शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.
सरकारने आंदोलनकर्त्यांना दिलेल्या आश्वासनांनुसार, 20 जुलै रोजी संसद मार्चदरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, अशी हमी देण्यात आली आहे. तसेच पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा यावर संसदेत सविस्तर चर्चा केली जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. याशिवाय, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही सरकारकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सरकारच्या निर्णयांची माहिती दिल्यानंतर सोनम वांगचूक यांनी जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ज्यूस पिऊन 26 दिवसांचे आमरण उपोषण अधिकृतपणे समाप्त केले. NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या या आश्वासनांमुळे आता पुढील घडामोडींवर देशभराचे लक्ष लागले आहे.
